राष्ट्रगीतावर वादग्रस्त वक्तव्य: वंदे मातरम हे राष्ट्रगीत हवे – महंत रामगिरी महाराज
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
मुंबई, 8 जानेवारी 2025
महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “देशाचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ नसून ‘वंदे मातरम’ असले पाहिजे,” असे विधान त्यांनी संभाजीनगर येथे केले. मिशन अयोध्या या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विधान मांडले.
रामगिरी महाराज म्हणाले की, “‘जन गण मन’ हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये कोलकात्यात जॉर्ज पंचम यांच्या स्तुतीसाठी गायले होते. हे राष्ट्राला समर्पित नाही. खरे राष्ट्रगीत म्हणजे ‘वंदे मातरम’ आहे, कारण त्यातून राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा अभिमान व्यक्त होतो.”
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “ब्रिटिश राजवटीच्या काळात शिक्षण संस्था चालवणाऱ्या लोकांना ब्रिटिशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी असे कृत्य करावे लागले. त्यामुळे टागोर यांनी जॉर्ज पंचम यांची स्तुती केली, ज्यामुळे त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.”
रामगिरी महाराज सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी महाराजांनी म्हटले की, “राष्ट्रगीत हा देशासाठी प्रबोधन करणारा आणि देशाला उद्देशून असावा. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत असावे, ही माझी मागणी आहे.”
देशभरातून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी यावर आक्षेप घेतला असून काहींनी त्याचे समर्थन केले आहे. यामुळे पुन्हा एकदा इतिहासाच्या विश्लेषणावर चर्चा रंगणार आहे.
अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि विश्लेषणांसाठी ‘माझा आवाज’ या पोर्टलला फॉलो करा. आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सवरही तुम्ही जोडले जाऊ शकता.









