पिंपरीत १८ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या, परप्रांतीय तरुणांना अटक
माझा आवाज विशेष प्रतिनिधी पुणे
पिंपरी, दि. १२: पिंपरी चिंचवड परिसरात रविवारी रात्री एका १८ वर्षीय तरुणीची दोन परप्रांतीय तरुणांनी भररस्त्यात हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कोमल भरत जाधव असे मृत तरुणीचे नाव असून ती वाल्हेकरवाडी येथील कृष्णाईनगर परिसरात कुटुंबासोबत राहत होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोमलला घराबाहेर बोलावले. खाली येताच आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोमल गंभीर जखमी झाली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले, मात्र ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तपास सुरू केला. चिंचवड पोलिसांच्या डीबी स्कॉड आणि गुंडा विरोधी पथकाने तातडीने आरोपींचा माग काढला आणि काही तासांतच त्यांना अटक केली. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी दिल्लीचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये कधीपासून राहत होते आणि त्यांनी हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका १८ वर्षीय तरुणीची अशा प्रकारे हत्या झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
गुन्हेगारी वाढ आणि पोलिसांवरील दबाव
दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांवरील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. नागरिक सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. काही नागरिकांनी कल्याणनगरमधील दुर्घटनेचा उल्लेख करत पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यावेळी दिसणारी तत्परता सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी का दिसत नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी केवळ ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला अनुसरून कठोर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील. राज्यातील गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे कठोर पाऊले उचलण्याची अपेक्षा नागरिक करत आहेत.
सध्या पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून या हत्येमागील नेमके कारण लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.









