बुलढाणा जिल्ह्यातील गाई गावात विचित्र आजाराचा कहर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई, ८ जानेवारी २०२५
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या एका विचित्र आजाराने थैमान घातले आहे. बोंडगाव, कालवड, आणि हिंगणा या गावांमध्ये नागरिक अचानक केस गळतीने त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांत लोकांचे संपूर्ण टक्कल पडत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत या अज्ञात आजारामुळे जवळपास ५० जण प्रभावित झाले आहेत, ज्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासणी सुरू केली आहे. गावातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक निरीक्षणांनुसार, दूषित पाणी हा या विचित्र आजाराचा संभाव्य कारण असू शकतो. मात्र, काही रुग्णांनी त्वचारोग तज्ञांकडे उपचार घेतल्यानंतर हा प्रकार वापरल्या जाणाऱ्या शाम्पूमुळे घडत असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
गावातील सरपंच रामा पाटील थारकर यांनी सांगितले की, “गेल्या दहा दिवसांपासून आमच्या गावामध्ये अजब आजार पसरलेला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, आणि जवळपास २० नागरिक टक्कल झाले आहेत. आम्ही याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.”
आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
आरोग्य विभागाने गावांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आणि आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्वेक्षण सुरू केले आहे. पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर या आजाराच्या मूळ कारणाचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.
माझा आवाजच्या वाचकांना विनंती
अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी माझा आवाज न्यूज पोर्टलला फॉलो करा. आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर देखील आम्हाला फॉलो करा आणि अपडेट राहा.









