कुकटोळी ग्रामपंचायतीविरोधात दिवाणी न्यायालयाचा कठोर आदेश – सरपंचांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश
माझा आवाज विशेष प्रतिनिधी
सांगली, 27 जानेवारी 2025
कुकटोळी येथील सुनंदा सुतार आणि शिवाजी सुतार यांनी त्यांच्या गट क्रमांक 697 अ मध्ये झालेल्या बेकायदेशीर हस्तक्षेपाविरोधात कवंटे महाकाळ येथील दिवाणी न्यायालयात 2011 पासून सुरू केलेल्या लढ्याचा अखेर निकाल लागला आहे.
सुतार दाम्पत्याने त्यांच्या जमिनीवरील माती चोरी, बांध मोडतोड आणि शेतीच्या नुकसानीसंदर्भात 22 जून 2011 रोजी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने ग्रामपंचायत कुकटोळी यांना स्पष्ट आदेश दिले होते की, भविष्यात अशा प्रकारचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जावी.
तथापि, या आदेशाचे पालन न करता, ग्रामपंचायत कुकटोळीने 23 नोव्हेंबर 2023 रोजी पुन्हा एकदा सुनंदा सुतार यांच्या जमिनीवरील माती चोरी करून बांध मोडल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे सुनंदा सुतार यांनी नुकसानीबाबत न्यायालयाकडे पुनश्च अर्ज केला.
दिवाणी न्यायालयाने ग्रामपंचायत कुकटोळी यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलत सरपंचांची खुर्ची जप्त करण्याचा आदेश बेलिफद्वारे दिला आहे. या प्रकरणातील सुतार दाम्पत्याचे वकील, ऍड. विजयरत्न निवांत आटपाडकर यांनी यशस्वीपणे या लढ्याचे प्रतिनिधित्व केले.
‘माझा आवाज’च्या वाचकांसाठी महत्त्वाचे:
कायदेशीर लढ्यांतून मिळालेला हा न्याय ग्रामस्थांसाठी एक आदर्श ठरू शकतो. अशाच महत्त्वाच्या बातम्या, अपडेट्स, आणि विश्लेषणासाठी ‘माझा आवाज’ न्यूज पोर्टलला भेट द्या. आमच्याशी जोडले राहण्यासाठी सोशल मीडिया हँडल्सवर देखील फॉलो करा!









